महाराष्ट्र

तीन पिढ्यांची सामाजिक परंपरा – गायकवाड कुटुंब मोहिते-पाटीलांच्या सोबत आजही खंबीर!

सौ. प्रतिभा गायकवाड : महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व!

मोहिते-पाटील परिवाराच्या कार्याला सदैव साथ देणारे अकलूजचे गायकवाड कुटुंब — तिसऱ्या पिढीतही सामाजिक परंपरेचा वारसा कायम

अकलूज दि.११ (प्रतिनिधी) : मोहिते-पाटील परिवाराच्या सामाजिक आणि विकासात्मक कार्यात गेल्या तीन पिढ्यांपासून साथ देत असलेले गायकवाड कुटुंब आजही तितक्याच निष्ठेने समाजकार्यात कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकता आणि विकासासाठी समर्पण या गुणांमुळे गायकवाड कुटुंब अकलूजच्या सामाजिक नकाशावर विशेष ठसा उमटवित आहे.

या कुटुंबाच्या सामाजिक प्रवासाची सुरुवात कर्मवीर बाबासाहेब माने-पाटील, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि माजी आमदार चांगोजीराव आबासाहेब देशमुख यांनी अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत बाबुराव बापू गायकवाड यांना सदस्य म्हणून दिलेल्या संधीपासून झाली. या विश्वासाने त्यांनी समाजकार्यात पाऊल ठेवले आणि त्यानंतर कुटुंबाची पिढ्यान्पिढ्या सामाजिक कार्याची परंपरा सुरुच राहिली.

यानंतर या कार्याचा वारसा सून सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड यांनी पुढे चालवला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटीलजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याचा नवा अध्याय सुरू केला.

सौ. प्रतिभा गायकवाड यांनी शिक्षण आर्ट्स शाखेतून पूर्ण केले असून, २०१० ते २०१५ दरम्यान अकलूज ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून कार्य केले. या काळात उपसरपंच संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या समितीवर सदस्य म्हणून, तसेच अकलूज पोलीस स्टेशनच्या दक्षता समितीत कार्य केले आहे.

राजकारणातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. २०१३ ते २०१७ दरम्यान त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकलूज शहर महिला अध्यक्षा राहिल्या आणि महिलांच्या संघटनात्मक बळकटीसाठी त्यांनी परिश्रम घेतले.

२०१६ पासून सौ. गायकवाड ‘लोकायत लोकसंचलित साधन केंद्रा’च्या महिला बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या पुढाकाराने आजपर्यंत ४०९ बचत गट स्थापन झाले असून त्यामध्ये ४०९५ महिला सदस्य आहेत. या गटांमार्फत दरवर्षी जवळपास १० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले जाते. त्यामुळे अनेक महिला स्वावलंबी होऊन लघुउद्योग व व्यवसाय उभारण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य शिबिरे, एचबी टेस्ट, हेल्थ कॅम्प, विविध क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ‘सुषमा स्वराज स्मृती राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे.

“मी फळवणी सारख्या छोट्या गावातून अकलूजला सून म्हणून आले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची सदस्य होण्याची संधी विजयदादा आणि बाळदादांनी दिली. त्यामुळे मला सामाजिक कार्याची मोठी संधी मिळाली आणि त्याचे मी सोने केले आहे. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मला नगराध्यक्षा होण्याची संधी मिळाली तर मोहिते-पाटील परिवाराच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचा विकास करण्याचा माझा दृढ मानस आहे.”— सौ. प्रतिभा विलासनंद गायकवाड, माजी सदस्य, अकलूज ग्रामपंचायत

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!