अकलूज चोरी प्रकरणी गुजरात चोरांचे कनेक्शन उघड, आरोपी अकलूज पोलिसांच्या ताब्यात
अकलूज हद्दीतील चोरी प्रकरणात मोठा खुलासा, हुंडई क्रेटासह आरोपी ताब्यात

अकलूज पोलिसांची मोठी कामगिरी; परराज्यातील चोरी टोळी जेरबंद
अकलूज : अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्यात परराज्यातील टोळीला अटक करण्यात अकलूज पोलिसांना यश आले आहे. सदर कारवाईत तब्बल 5 लाख 45 हजार रुपयांच्या रकमेपैकी 5,13,180 रु. हस्तगत करण्यात आले आहेत.
फिर्यादी आनंद हनुमंतराव भोसले (रा. यशवंतनगर, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९.०० ते सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास यशवंतनगर येथील बी.एस. कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमधील ड्रॉवरमधून ५,४५,००० रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असताना घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनाची ओळख पटविण्यात आली. सदर फुटेज गुजरात राज्यातील सापुतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाठविण्यात आले असता, तेथील पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयित वाहन ताब्यात घेतले.
तपासादरम्यान तीन संशयित इसमांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
- अनिलभाई रेवानाई भांभोरे (वय २७),
- मिथुनभाई रेवानाई भांभोरे (वय ३४),
- वकील तेजसिंग भांभोरे (वय ३२),
सर्व रा.अंबोली खुर्दरिया शिपाडा, फलिया, ता. गरवाडा, जि. दाहोद, राज्य गुजरात.
आरोपींकडून चोरीस गेलेली ५,१३,९८० रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली हुंडई क्रेटा कार (क्रमांक GJ-20CB-2646), तीन मोबाईल, लोखंडी कटावणी, काचेची रांगी बॅग व लोखंडी पकड अशा एकूण २०,२६,६८० रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.
सदर आरोपींना अकलूज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखा अकलूजचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस कर्मचारी विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षीरसागर, शिवकुमार मदभावी, अभिजीत कुंभार, रणजीत जगताप, दत्तात्रय खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, सायबर चे तांबोळी यांनी कामगिरी केली आहे.



