महाराष्ट्र

FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; मोफत पाणी न दिल्यास परवाना धोक्यात

हॉटेलमधील पाण्याच्या लुटीला लगाम; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

तुकाराम मुंढेंचा आणखी एक मोठा दणका! हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक

मुंबई | इन महाराष्ट्र न्यूज

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा धडाका लावला आहे. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी विविध निर्णय घेत असताना आता त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच फाईव्ह स्टार हॉटेल्सबाबत एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार राज्यातील सर्व हॉटेल्स आणि भोजनालयांमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा फलकही प्रत्येक आस्थापनाने दर्शनी भागात लावणे आवश्यक राहणार आहे.

ग्राहकांना काय मिळणार?

नवीन आदेशानुसार ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना सर्वप्रथम सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे आवश्यक राहणार आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. अनेक ठिकाणी ग्राहकांना महागड्या मिनरल वॉटरच्या बाटल्या घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मिनरल वॉटरची सक्ती बंद

ग्राहकाने स्पष्टपणे मागणी केल्याशिवाय त्याला थेट मिनरल वॉटर किंवा पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरची बाटली देण्यात येणार नाही. ग्राहकाला प्रथम नियमित स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.

पाण्याच्या गुणवत्तेवर विशेष भर

मोफत दिले जाणारे पाणी केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर प्रत्यक्षात पूर्णपणे शुद्ध, सुरक्षित आणि पिण्यायोग्य असणे आवश्यक आहे. यासाठी FDA चे अधिकारी राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांवर अचानक तपासण्या करणार असून पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी घेतली जाणार आहे.

स्वच्छतेच्या अतिरिक्त सुविधा देखील बंधनकारक

ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेत हॉटेल चालकांना हात धुण्यासाठी आवश्यक सुविधा, द्रव साबण, स्वच्छ टॉवेल आणि स्वच्छताविषयक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

नियम मोडल्यास कठोर कारवाई

ग्राहकांना मोफत पाणी न देणे, अस्वच्छ पाणी पुरवणे किंवा स्वच्छतेचे नियम न पाळल्यास संबंधित हॉटेल चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ग्राहकांना अशा प्रकारच्या तक्रारी FDA कडे करण्याचा अधिकार देण्यात आला असून तक्रार सत्य आढळल्यास दंड, परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते.

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण

राज्यातील अनेक ग्राहकांनी हॉटेलमध्ये पाण्याच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक लुटीबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ग्राहकांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा आणि व्यावसायिकांची मनमानी थांबावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र” या अभियानांतर्गत नागरिकांचे आरोग्य जपणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार असून हॉटेल व्यवसायात पारदर्शकता आणि स्वच्छतेलाही चालना मिळणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!