अकलूज च्या शाहिराला सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहीर
शाहीर राजेंद्र कांबळे यांना सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहीर

दत्ता नाईकनवरे : प्रतिनिधी
अकलूज येथील शाहीर राजेंद्र कांबळे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार जाहिर झाला असून हा पुरस्कार १४ जून २०२५ रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.
शाहीर राजेंद्र कांबळे हे अकलूजचे रहिवाशी असून इयत्ता ७ वी मध्ये त्यांना पोवाड्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा गायला. गेली ४० वर्षे देशभर शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमातून अनेक विषयांवर जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा, सामाजिक प्रबोधन, महापुरुषांचे चरीत्र यांची मांडणी केली आहे. मराठ्यांचे शूर सेनापती दत्ताजी शिंदे यांचे जीवनावर एक हजार कडव्यांचा पोवाडा लिहून स्वत: गायला आहे. त्यांनी ६० पोवाड्यांचे लिखान केले आहे. इंदौर संस्थानचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांचे जीवनावर आधारीत २१० ओळीचा पोवाडा त्यांनी तयार करून गायला आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, वीर शिवा काशिद, महात्मा फुले, डॅा.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील आदिंच्या जीवनावर अधारीत पोवाडे लिहून स्वत: गायले आहेत. महाराष्ट्र व देशभरात दहा हजारांपेक्षा जास्त शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. १८ पोवाडा कॅसेट त्यांच्या प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकलुज भुषण पुरस्कार २०२५, भालेराव प्रतिष्ठान जळगाव, शाहिर फाटे पुरस्कार, मरवडे कृषिरत्न पुरस्कार, २०२५ शाहीर अमर शेख पुरस्कार, भिमरत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. रयतेचा राजा राजा शिवछत्रपती या महानाट्याचा पोवाडा त्यांनी गायला आहे. लोककला व शाहिरी या विषयावर महाराष्ट्र शासन आयोजित कार्यशाळेत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्वोत्कृष्ट लोककलावंत हा पुरस्कार जाहिर केला आहे. त्याचे वितरण १४ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा मुंबई येथे करण्यात येणार आहे.
या निमित्ताने शाहीरी राजेंद्र कांबळे यांचे अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई, अकलूज शाखा व समस्त नाट्य रसिक यांचे वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.