महाराष्ट्र

पांडुरंगच्या शेतकऱ्यांना गाळप झालेल्या ऊसाला एकूण दर मिळणार 2751 रु.-चेअरमन प्रशांतराव परिचारक

दिवाळीपूर्वी राहिलेली सर्व रक्कम देणार-चेअरमन प्रशांतराव परिचारक

श्रीपूर  तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीपूर येथील कारखाना स्थळावरती आयोजित करण्यात आली होती. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसाला 2751 रुपये एवढा दर देण्याची आज घोषणा केली.  याचे सर्व सभासदांनी स्वागत केले.

श्री पांडुरंग कारखान्याची एफआरपी ची रक्कम 2694 रू. एवढी आहे. त्यापैकी कारखान्याने शेतकऱ्यांना आज अखेर 2600 रु. दिले आहेत. सध्या एफ आर पी मधील रक्कम  रुपये 94  देण्याचे राहिलेले आहेत. त्यामध्ये वाढीव रक्कम घालून एकंदरीत मिळून गाळप झालेल्या ऊसाला 2751 रुपये एवढा दर दिवाळी अगोदर देण्याची सभेमध्ये घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे पांडुरंगाच्या सभासदांना प्रति टन 2751 रुपये ऊस दर मिळणार आहे. यावेळी कारखान्याच्या प्रगतीपथाचा पूर्ण आलेख दर्शवणारी विज्युअल ऑडिओ व्हिडिओ फीत सर्व सभासदांना दाखवण्यात आले.  यावेळी श्रद्धे सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्याचा आढावा देखील घेण्यात आला. 

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी वार्षिक सभेपुढील मांडलेल्या विषयांना सर्व  शेतकरी सभासदांनी एकमताने  मंजुरी दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचे भारतातील सर्वात नवीन लेटेस्ट मशीन पांडुरंग कारखान्याने घाण पाणी स्वच्छ करण्यासाठी व परत ते पुनर्वापरात येण्यासाठी बसविल्याचे सांगितले. 

कारखान्याचे वा.चेअरमन कैलास खुळे सर यांनी सर्वांचे स्वागत केले. उपस्थित सर्वांनी कारखान्याचे जे सभासद शेतकरी मरण पावले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

ऊस भूषण पुरस्कार – पुंडलिक मोरे, मुंढेवाडी

यानंतर कारखान्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रातून ऊस भूषण पुरस्कारासाठी सभासद शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती यावर्षीच्या पुरस्कारासाठी एकरी ८७.८७४ टन ऊस उत्पादन घेतलेल्या पुंडलिक मोरे यांना एक लाख एकशे अकरा रुपये, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप देऊन सर्व कुटुंबासमवेत चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार :

कारखान्याच्या सहा गटातून प्रत्येक गटात अधिक उत्पादन घेणारे शेतकऱ्यांचा पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये खर्डी येथील शकुंतला भगवान रोंगे. (पंढरपूर गट) एकरी उत्पन्न ८२.४३८ टन., नारायन चिंचोली येथील माणिक हरी भोसले (देगांव गट) एकरी उत्पन्न ७१.०८५ टन., सिध्देवाडी येथील रामचंद्र नाथा जाधव.(चळे गट) एकरी उत्पन्न ७४.५६८ टन, पिराची कुरोली येथील राहुल मच्छिंद्र सावंत. ( भाळवणी गट) एकरी उत्पन्न ८८.२१२ टन., नेमतवाडी येथील हिम्मत हणमंत खुळे. (भोसे गट) ९४.३४४ टन, बादलकोट येथील नारायण विश्वनाथ चौगुले (करकंब गट) एकरी उत्पन्न ४९.२०९ टन. या सहा शेतकऱ्यांना कुटुंबासमवेत  25111 रुपये, शाल, श्रीफळ व फेटा बांधून चेअरमन . प्रशांतराव परिचारक व उपस्थित  मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, पंढरपूर बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, पंढरपूर अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे, कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हनुमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन स्वीकृत सभासद सदस्यांची निवड घोषित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर पोकळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!