गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मांडकीला मिळाले भव्य प्रवेशद्वार | एकोप्याचे दर्शन
युवा व ज्येष्ठांच्या एकत्रित विचारातून मांडकीत ऐतिहासिक प्रवेशकमान उभारणी

लोकवर्गणीतून उभारले प्रवेशद्वार; मांडकी गावाचा विकासाचा नवा टप्पा
युवा पिढी व ज्येष्ठ नागरिकांच्या एकत्रित विचारातून गावविकासाला गती
अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे ) :
माळशिरस तालुक्यातील मांडकी येथे लोकसहभाग आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन गुढी पाडवा या पवित्र सणाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“जशी घराला शोभा अंगणातील तुळशी वृंदावनामुळे वाढते, तसेच गावाची ओळख आणि सौंदर्य त्याच्या प्रवेशद्वारातून दिसून येते,” या उक्तीप्रमाणे मांडकी गावाला आज एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागातून उभारलेली ही भव्य प्रवेशकमान केवळ वास्तू नसून, ती गावातील एकात्मता, सांस्कृतिक जाणीव आणि इतिहासाप्रती असलेल्या आदराची साक्ष देणारी आहे.
या उपक्रमामागे गावातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग होता. प्रत्येकाच्या योगदानातून ही उभारणी शक्य झाल्याने ही कमान ‘आपली सर्वांची’ असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. शिरीष रणनवरे यांच्या प्रस्ताविकाने झाली, ज्यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडत गावविकासासाठी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद सदस्य गौतम आबा माने, पंचायत समिती सदस्य बाबा माने, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. रामदास देशमुख, लक्ष्मण तात्या पवार तसेच युवा नेते यशराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोपट आबा रणनवरे यांनी केले. तर कार्यक्रमाची सांगता शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक संग्रामसिंह रणनवरे यांनी आभार प्रदर्शनाने केली.
📦 “मांडकी गाव हे सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गावातील विकास हा कोणत्याही एका घटकावर आधारित नसून सर्वांच्या सामूहिक विचारातून घडत आहे. विशेष म्हणजे, गावातील लोक राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देतात. याच एकोप्यामुळे मांडकी गाव विकासाच्या दिशेने सातत्याने प्रगती करत आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले हे प्रवेशद्वार आणि त्याला देण्यात आलेले महापुरुषाचे नाव हे गावाच्या एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरले आहे.”
संपादक: दत्ता नाईकनवरे,इन महाराष्ट्र न्यूज




