गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती | Mahalung-Shreepur
ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोड्यांना आळा बसू शकेल – गणेश लोकरे वरिष्ठ विभागीय अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा सोलापूर

एका कॉल वर गाव सतर्क होणार | संकट काळात मदत मिळणार | ग्राम सुरक्षादल यंत्रणा सतर्क
अकलूज पोलिस स्टेशन अंतर्गत श्रीपूर पोलीस आऊट पोस्ट अंतर्गत महाळुंग-श्रीपूर, बोरगाव, नेवरे, जांभूड, माळेवाडी-बोरगाव, मिरे, माळखंबी आदि गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रम श्रीपूर मध्ये श्री चंद्रशेखर विद्यालयात घेण्यात आला.
आपत्कालीन स्थितीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल-फ्री क्रमांकावर (18002703600) फोन केल्यास एकाच वेळी गावातील सर्व नागरिकांशी संपर्क साधला जाईल. त्यातुन इतरांना सावध करता येईल, तसेच मदतीसाठी बोलविता येईल, ही यंत्रणा ग्रामपंचायती मार्फत गावात राबवली जाणार आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणा ही ग्रामीण भागासाठी प्रभावी ठरेल. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे चोरी व दरोड्यांना आळा बसू शकेल. पोलिस यंत्रणेस कायदा व सुव्यवस्था कायम राखणे यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळते. प्रशासनाला नागरिकांशी जलद संपर्क साधता येतो. सदर गावांमध्ये आपत्कालीन ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेविषयीचे पुस्तकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अकलूज पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती दत्तात्रय कांबळे मॅडम, गणेश लोकरे ग्राम सुरक्षा यंत्रणा वरिष्ठ विभागीय अधिकारी सोलापूर, विक्रमसिंह घाटगे जिल्हा समन्वयक, सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब पानसरे, पोलीस हवालदार किशोर गायकवाड, पोलीस हवालदार संजय चंदनशिवे, सतिश शिंदे संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, अनिकेत भोसले संपर्क अधिकारी ग्राम सुरक्षा यंत्रणा, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी अशोक चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे, नगरसेविका तेजश्री लाटे, पैलवान अशोक चव्हाण, मेजर जालिंदर लोखंडे, आरपीआयचे ज्येष्ठ नेते शामराव भोसले, भारत आठवले, बोरगावचे पोलीस पाटील वीरू पाटील, स्थानिक ग्रामस्थ आसपासच्या गावातील पोलीस पाटील, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचे वरिष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे मार्गदर्शन करताना म्हणाले, ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवल्यास जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास व जिल्ह्यातील महत्त्वाची माहिती नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचवणे सुलभ होईल. ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा आहे. गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत आहे. संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600 आहे. यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो. संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो. एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य आहे. यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेची आवश्यकता आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांत ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत करण्यात आली असुन चोरी-दरोड्याची घटना, महिलांसंदर्भातील गुन्हे, लहान मुले हरविणे, वाहन चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राण्यांचा हल्ला, आग जाळीताची घटना इ. घटनांमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे तातडीने मदत मिळणे व दुर्घटनांना आळा घालणे प्रभावीपणे शक्य होत आहे. सर्व नागरिकांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा संकटाच्या वेळी प्रभावी वापर करावा व पोलीस यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.