तरुण पिढीसाठी स्वराज्याचा संदेश; 23 फेब्रुवारीला श्रीपूरात ऐतिहासिक सादरीकरण
डीजेऐवजी महानाट्याचा मार्ग; श्रीपूरात शिवविचारांची अनोखी जनजागृती

शिवजयंतीनिमित्त श्रीपूरात ‘रायबा, हेच का आपले स्वराज्य’ महानाट्याचा थाट
महामानव प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; 40×50 फुटांच्या भव्य स्टेजवर शिवचरित्र
महामानव प्रतिष्ठान, श्रीपूर यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त “रायबा, हेच का आपले स्वराज्य” हे तडाखेबंद महानाट्य सोमवारी, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीपूर मध्ये…
श्रीपूर (ता. माळशिरस) – श्रीपूर येथील महामानव प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजप्रबोधनात्मक आणि ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देणारे आणि स्वराज्याच्या संकल्पनेवर भाष्य करणारे “रायबा, हेच का आपले स्वराज्य” हे तडाखेबंद महानाट्य सोमवारी, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सादर करण्यात येणार आहे.
हे महानाट्य जय हो एंटरटेनमेंट पुणे निर्मित असून श्रीपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर चौक या मार्गावर, दुनियादारी चहा समोर वडाच्या झाडाखाली भव्य रंगमंचावर सादर होणार आहे. यासाठी तब्बल 40 फूट बाय 50 फूट एवढा भव्य स्टेज उभारण्यात येणार असून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, अनेक शूर मावळ्यांची भुमिका करणारे कलाकार हुबेहुब कला सादर करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक घटकाला सोबत घेतले आणि खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक स्वराज्य उभारले. असे जिवंत प्रसंग यामध्ये सादर केले जाणार आहेत.
महामानव प्रतिष्ठान, जयंती उत्सव अध्यक्ष योगेश गाडे, उपाध्यक्ष अक्षय शिरसाट, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विश्वजीत भालशंकर, अजित भोसले, प्रथमेश लोंढे, सतीश हाके पाटील यांनी याबाबत माहिती दिली. डीजे, डॉल्बी अशा वायफळ खर्चाला फाटा देत लोप पावत चाललेल्या नाट्यकलेला चालना देण्याचा आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहोचावेत, स्वराज्याची खरी संकल्पना समजावी आणि सामाजिक बांधिलकी वाढावी या हेतूने हे महानाट्य सादर करण्यात येत आहे. त्यामुळे या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
“सर्व नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून या ऐतिहासिक महानाट्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रथमेश लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय व इतर सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



